कोल्हापूर : कोराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. मास्क लावल्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. मात्र, कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे आजही मास्क वापरणे अनिवार्य आहे. मात्र, अनेकजण जणू कोरोना संपल्याचेच समजून सर्वत्र गर्दी करत आहेत. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्येही अशीच परिस्थिती आहे. याठिकाणी मास्क न वापरण्यांमध्ये चक्क वाहक, चालकच आघाडीवर आहेत. ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ हे आता केवळ एस. टी.वर लिहिण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.
गर्दीच्या ठिकाणी विनामास्क एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. आता कोरोनावर लस आली असली, तरीही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे अजूनही काळजी घेणे अनिवार्य आहे. एस. टी. बसेस, बसस्थानके आदींमध्ये हा धोका आजही कायम आहे. त्यामुळे मास्क सर्वत्र वापरणे बंधनकारक आहे. याच्या उलट एस. टी. बसेस व स्थानकात वाहक, चालकच विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे त्यांनी जरी प्रवाशांना मास्क वापरा, असे सांगितले तरी त्यांच्या सूचनेकडे कोणीही लक्ष देत नाही, याची प्रचिती कोल्हापूरमधील मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी आली.
प्रतिक्रिया
प्रवाशांना अमूक एक गाडी लागल्याचे मोठ्याने सांगावे लागते. त्यामुळे मास्क काढावा लागतो. गाडी गरम झाल्यानंतर श्वास घेताना अडचणी येतात. त्यामुळे काही काळ मास्क हनुवटीवर घेतो.
- संजय बारपत्रे, चालक
-०३०२२०२१-कोल-संजय बारपत्रे (एस. टी.)
प्रवाशांना अमूक गाडी असल्याचे सांगण्यासाठी मास्कमधून आवाज जात नाही. त्यामुळे तोंडावरील मास्क बाजूला करावा लागतो. गाडीमध्ये मास्क घालूनच इतर प्रवाशांनाही मास्क लावण्याची सूचना आम्ही वारंवार देतो.
- सुनील पाटील, वाहक
-०३०२२०२१-कोल-सुनील पाटील (एस. टी)
काही काळासाठी मास्क बाजूला केला होता. बसमध्ये नियमित वापरतो. प्रवाशांनाही मास्क लावण्याची वारंवार सूचना करतो.
- शामराव सुतार, वाहक
-०३०२२०२१-कोल-शामराव सुतार (एस. टी.)
एस. टी. बसमध्ये बसल्यानंतर मी मास्क काढला आहे. नियमित मास्क वापरतो. गाडीत बसल्यानंतर श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे मी मास्क काढला.
- सुरज सोहनी, प्रवासी, सांगोला, पंढरपूर