जयसिंगपूर : कॅन्सरला शेतकरी जबाबदार नसून, पंचगंगा नदीपात्रातील रासायनिक दूषित पाणीच जबाबदार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. पंचगंगेचे प्रदूषण हेच मोठे दुखणे असून, शिरोळ तालुक्याबरोबरच पंचगंगा नदीकाठच्या गावांत कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरला थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, जयसिंगपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त येथील स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात कॅन्सर मुक्ती परिषद झाली.
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आशितोष पाटील म्हणाले, धूम्रपानाच्या सवयीमुळे ९५ टक्के लोकांना कॅन्सर होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे साडेसतरा लाख कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी आढळतात, तर दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो आहे. कॅन्सर होऊ नये यासाठी प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांची मानसिकता बदलावी.
बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले, शिरोळ तालुक्यात कॅन्सरमुक्तीची चळवळ यशस्वी करायची असेल तर विषमुक्त शेती व निरोगी भारत अभियान राबविले पाहिजे.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, सावकर मादनाईक यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, आसावरी आडके, मुक्ताबाई वगरे, डॉ. महावीर अक्कोळे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, अभय भिलवडे, वासुदेव भोजणे, आदी उपस्थित होते. स्वागत नगरसेवक शैलेश चौगुले यांनी केले. शैलेश आडके यांनी आभार मानले.
--------------
चौकट - जीवनशैली बदलण्याची गरज : शंकर गौडा
शेतीसाठी वापरली जाणारी ५०० कीटकनाशके धोकादायक आहेत. औषधे फवारणेबाबत प्रबोधन गरजेचे असून, आरोग्याला की उत्पादनाला महत्त्व द्यायचे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. शिरोळ तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या रक्तांचे नमुने तपासले तर आरोग्याची नेमकी वस्तुस्थिती पुढे येणार आहे, असे रायचूर विद्यापीठाचे कार्यकारी संचालक शंकर गौडा यांनी सांगितले.
फोटो - ०४०२२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे कॅन्सर मुक्ती परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.