लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी - मेघोली, ता. भुदरगड येथील लघुपाटबंधारे तलाव रात्री साडेदहाच्या सुमारास फुटला. हा तलाव फुटल्याने नदीकाठी असलेल्या पाण्याच्या मोटारी वाहून गेल्या. शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे.
भुदरगड तालुक्याच्या दक्षिणेला मेघोली गाव आहे. या गावाला नदी नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी डोंगरालगत ९८ दलघफू क्षमतेचा मातीचा लघुपाटबंधारे तलाव बांधला आहे. हा तलाव तेथील ओढ्यांवर बांधलेला आहे. या तलावाच्या पाण्याखाली ११ लघुबंधारे असून, ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास पाण्याच्या आउटलेटजवळून बंधारा फुटला. बंधारा फुटल्याने गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेकडो एकर जमिनीवरील पिके आणि माती या पाण्याने धुऊन जाणार आहे. हे धरण फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. सुदैवाने गाव बाजूला असल्याने जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही. या गावाला पाण्यापासून धोका संभवत नाही. धरण फुटल्याने गावात गोंधळाचे वातावरण पसरले आहे. या धरणाच्या पाण्यामुळे वेदगंगेच्या नदीपात्रात फारसे पाणी वाढण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पाण्याचा विसर्ग अतिजलद झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप आणि काळोख असल्याने काहीही दिसत नव्हते. मोबाईल फोन्सना रेंज नसल्याने संपर्कात अडथळे निर्माण होत आहेत. तालुक्यातील इतर ठिकाणचे अनेक नातेवाईक चौकशीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते, पण संपर्क होत नव्हता. येत्या उन्हाळ्यात या भागातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यावाचून वाळणार आहेत. धरण फुटल्याची वार्ता समजताच तहसीलदार अश्विनी अडसूळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख त्यांचे सहकारी पोलीस, पोलीस पाटील, तलाठी, मंडल अधिकारी राजे शिर्के घटनास्थळी दाखल झाले होते.