कोल्हापूर : विद्यापीठाच्या विकासामध्ये अधिसभा सदस्यांची भूमिका प्रभावी असते. त्यांनी सर्व घटकांच्या विकासासाठी आग्रही राहायला हवे, असा सूर शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी अधिसभा सदस्यांसाठी आयोजित कार्यशाळेत उमटला.
विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ अकॅडेमिक ॲडमिनिस्ट्रेशन (एएए) च्या वतीने ‘अधिसभेची कार्यप्रणाली’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ए.पी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
अधिसभा सदस्यांनी आपली कार्यमर्यादा केवळ अधिसभेच्या बैठकीपुरती असल्याचे समजू नये. विविध प्रश्न मांडण्यासाठी अधिसभेच्या बैठकीची वाट न पाहता विद्यापीठाचे कुलगुरू अगर संबंधित विभाग प्रमुखाशी आवश्यक पत्रव्यवहार केल्यास संबंधित प्रश्न मार्गी लागू शकतो. संवादातून प्रश्न सोडविण्याची भूमिका सर्वच घटकांनी घेतल्यास अधिसभेमध्ये अधिक धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध होऊ शकेल, असे डॉ. शिर्के यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. एस.टी. कोंबडे यांनी आभार मानले.
मार्गदर्शक म्हणाले
ए.पी. कुलकर्णी : सदस्यांनी आपले कार्य केवळ अधिसभेपुरते सीमित न करता वर्षभर विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत राहिले पाहिजे. माजी विद्यार्थ्यांकडे आपण केवळ आर्थिक लाभाचे साधन म्हणून नव्हे, तर ज्ञानाचे भांडार म्हणूनही पाहायला हवे.
राजेंद्र कांकरिया : अधिसभेमध्ये आपण सर्वच संबंधित घटकांचे प्रश्न मांडत असतो. तथापि, आपला सर्वाधिक भर हा विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकडे असायला हवा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ज्या विविध समित्यांची, मंडळांची स्थापना करणे अपेक्षित आहे.
बी. एम. हिर्डेकर : अधिसभा सदस्यांनी आपले प्रश्न वा प्रस्ताव नाकारले गेल्यास सभात्याग करण्यापेक्षा सभागृहात चर्चा घडवून आणण्यावर भर द्यावा. संबंधित प्रश्नी योग्य तोडगा अगर पर्याय काढण्याचा प्रयत्न करावा.
फोटो (०५०२२०२१-कोल-अधिसभा कार्यशाळा) : शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी अधिसभेची कार्यप्रणाली या विषयावरील कार्यशाळेत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून एस.टी. कोंबडे, राजेंद्र कांकरिया, ए. पी. कुलकर्णी, पी. एस. पाटील, विलास नांदवडेकर, व्ही. टी. पाटील, बी.एम. हिर्डेकर उपस्थित होते.