इचलकरंजी : महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिकाधारकांच्या विरोधात घेतलेला निर्णय रद्द करावा, तसेच कोरोना महामारीच्या काळातील आठ महिन्यांचे वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. तेथे मोर्चेकऱ्यांनी ‘धान्य आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, वीज बिल माफ करा’ अशा घोषणा दिल्या. शिधापत्रिका धारकांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास यामध्ये अनेक कुटुंबांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तो निर्णय रद्द करावा. एक लाखापर्यंत ज्याचे उत्पन्न आहे, त्या शिधापत्रिकांमध्ये कोणतेही बदल करू नयेत, तसेच एक लाखांवर ज्यांचे उत्पन्न आहे, त्यांचा सर्व्हे करून निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
मोर्चामध्ये रवी रजपुते, सुनील जावळे, नरेश नगरकर, झाकीर जमादार, चंद्रकांत कांबळे, रवी पाटोळे आदींसह महिला सहभागी होत्या.
फोटो ओळी ०४०२२०२१-आयसीएच-०१ महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिका धारकांच्या विरोधात घेतलेला निर्णय रद्द करावा, यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.