उदगाव : महावितरणकडून महापुराच्या काळात सुमारे पाच ते सहा महिने नदीवरील विद्युत मोटारी बंद असताना त्या काळातील वीजबिले शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. तसेच गेल्या वर्षभरात विद्युत मीटरचे रिडींग न घेताच शेतकऱ्यांना बिले अदा केली जात आहेत. त्यामुळे २ ऑगस्टला महावितरण कंपनीवर आंदोलन अंकुशच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.
चिंचवाड (ता. शिरोळ) येथे कृषिपंपधारकांचा मेळावा झाला. यावेळी चुडमुंगे म्हणाले, आंदोलन अंकुशतर्फे गेल्या वर्षभरापासून महावितरणविरूद्ध लढा सुरू आहे. महावितरण कंपनी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहे. या लुटीला बळी न पडता शेतकऱ्यांनी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन पाटोळे होते.
यावेळी आप्पासो कदम, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, योगेश जाधव, अमर गावडे, शशिकांत काळे, कृष्णा देशमुख, सुरगोंडा पाटील, सुरेश चौगुले, मयूर काळे, पोपट पाटोळे, कलगोंडा पाटील, सचिन मिरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.