कोल्हापूर : जुलैमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून पुढील काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल, सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी मिळाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी दिली.
सध्या जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील पंचनामे सुरु आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ७ व्यक्तींचा मृत्यू झाला. शासकीय निकषानुसार ६ व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पात्र असून त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. तर एका व्यक्तीच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत मदत देण्याबाबतचा प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आला
आहे. हस्तकला, हातमाग, क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------
नुकसानीचा प्रकार : संख्या : पंचनामे पूर्ण झालेले
पूरबाधित कुटुंब : ७१ हजार २८९ : ६१ हजार ८६४
घरांची अंशत: पडझड : ५ हजार ७८९ : ५ हजार १०३
घरांची पूर्ण पडझड : १ हजार १०७ : ८०९
गोठा पडझड : २ हजार ४६६ : ६४६
दुकानदार : १२ हजार १५७ : ९ हजार ६७५
हस्तकला, कारागीर : १ हजार १६९ :९४१
कृषी नुकसान : ५८ हजार ९९७ हेक्टर: २४ हजार ६७०
जनावरे : लहान मोठी १६१ जनावरे व १३ कुटुंबातील १५ हजार १७८ काेंबड्यांचा मृत्यू
-----------