सादिक नगारसे
हलकर्णी : नियती कधी कोणाशी कसा खेळ खेळेल, याचा नेम नाही. आपत्तीत एखादा आसरा शोधावा अन् तोच तिघांचा काळ ठरावा, असा प्रसंग मुगळी(ता. गडहिंग्लज)नजीक घडला. पावसापासून बचाव करण्यासाठी पोल्ट्रीच्या भिंतीचा आसरा घेतला. मात्र, त्याच भिंतीने काळ बनून एकाच कुटुंबातील कर्त्या पुरुष व महिलांना हिरावून नेल्याने त्या कुटुंबातील ८ अज्ञान बालकांसह व दोन व्याधिग्रस्त कर्त्या पुरुषांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात मयत झालेल्या संगीता कांबळे यांना ७ मुली. (१ विवाहित) तर गिरिजा कांबळे यांना २ मुले आहेत. या अपघातापूर्वीसुद्धा नियतीने काहीसा दणका या कुटुंबाला दिला आहे. ४ वर्षांपासून संगीता यांचे पती बसाप्पा हे अर्धांगवायूमुळे विकलांग झाले आहेत. गिरिजा यांचेही पती दोन वर्षांपूर्वी मयत झाल्याने हे कुटुंब आधीच संकटात होते. त्यामुळे संपूर्ण कांबळे कुटुंब संगीता व गिरिजा या दोन महिलांसह अजित कांबळे यांच्यावर विसंबून होते. ज्यांच्या आधाराने मुले जगत होती. ती आई, मामा व मामीलाच नियतीने हिरावून नेल्याने सर्व मुलांसह गावही सुन्न झाले आहे.
संगीता यांना सुप्रिया (१७), साक्षी (१४), भूमिका (१२), सृष्टी (९), अंजली (६), अर्पिता कांबळे (४) या सहा जणांची कुटुंबाची आई संगीता ही या अपघातात गेल्याने आणि वडील व आजोबा आजारी असल्याने मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. ओंकार (१८) व सौरभ (१६) यांच्यावरील आई-वडिलांचे छत्रच हरपल्याने तीही निराधार झाली आहेत.
---------------------------------
दानशूरांच्या मदतीची गरज
घरी अठरा विश्व दारिद्र्य. कुटुंबात दोन व्यक्ती आजारी, १८ वर्षांखालील ६ मुली आणि दोन मुले, घरात अशी बिकट परिस्थिती. यातून कुटुंब चालविणाऱ्या कर्त्या दोन महिला व एका पुरुषाच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंब उघड्यावर पडले आहे. खेळण्या- बागडायच्या वयात काळाने त्यांच्यावर जगण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची नितांत गरज आहे.
--------------------------------------------
फोटो ओळी :
नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील संगीता कांबळे यांच्या अपघाती निधनाने निराधार झालेल्या सहा मुली, तर दुसऱ्या छायाचित्रात आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या ओंकार व सौरभवरच कुटुंबाची जबाबदारी आली आहे.
क्रमांक : ०४०६२०२१-गड-०२/०३