लोकमत न्यू्ज नेटवर्क
कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर साचलेला दुर्गंधीयुक्त घनकचरा अखेर ग्रामपंचायतीने हलवला. तिथे साफसफाई करून तिथे पत्रे मारून बंदिस्त केले आहे. बालिंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीला घनकचरा टाकण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्गाशेजारी जागेत गेली अनेक वर्षे घनकचरा टाकला जातो. अलीकडे दोन्ही ग्रामपंचायती अतंर्गत कॉलनी वाढल्याने कचराही वाढला आहे. पावसाळ्यात तर कचरा कुजत असल्याने दुर्गंधी पसरत असते. त्यात या मार्गावरून येणारे जाणारेही येथेच कचरा टाकत असल्याने अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. यासाठी बालिंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीने हा कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता केली आहे. गेली आठ दिवस बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे व सदस्यांनी घनकचऱ्यावर काय मार्ग काढतो येतो, यावर विचार केला. महामार्गाच्या बाजूला पत्रे उभे करून कचरा डेपो बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला. बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई परिसरातील नागरिक येथे कचरा टाकत आहेत, यासाठी पत्रे उभारले असून रस्त्याच्या बाजूला पत्रे लावून परिसर बंधिस्त करणार आहे. गेली दोन दिवस जे.सी.बी. लावून कचरा खाणीत टाकला असून यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य नंदकुमार जांभळे, रंगराव वाडकर, विजय जांभळे, कृष्णात माळी, धनंजय ढेंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले.
बाहेरील कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई
या जागेत घन कचरा, मृत जनावरे, खराब अंथरूण, पांघरूण आदी वस्तू राजरोसपणे टाकली जातात. संबधितांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेतला आहे.
कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प
कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्पास पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंजुरी दिली असून सहा महिन्यात या कचऱ्याचा योग्य पध्दतीने विल्हेवाट लागेल. त्याचबरोबर ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून होत असल्याचे सरपंच मयूर जांभळे यांनी सांगितले.