या अपघातात लता राजेंद्र पाटील (वय ४०) व अनिषा राजेंद्र पाटील (१७) या माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला तर अथर्व राजेंद्र पाटील (१४), सुमीत राजेंद्र पाटील (१९), राजेंद्र शिवाजी पाटील (४४, सर्व रा. बिस्तूर. जि. सांगली) हे जखमी झाले.
या घटनेची अधिक माहिती अशी, राजेंद्र पाटील कुटुंबीय आपली कार क्रमांक (केए ०३ एनडी ५१६१) घेऊन सांगलीहून बंगळूरला निघाले हाेते. बेळगावच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा येथील कळंत्रे मळ्यानजीक आल्यावर राजेंद्र यांचा कारवरील ताबा सुटून कारची महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या झाडाला धडक बसली. या अपघातात लता व अनिषा या माय-लेकी जागीच ठार झाल्या तर कारमधील अन्य तिघे जखमी झाले.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह सहकाऱ्यांनी व महामार्ग देखभाल करणाऱ्या जयहिंद कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली. जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेत कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जखमींना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे खासगी रुग्णालगत दाखल केले आहे.
०७निपाणी
फोटो
निपाणी : कार झाडाला धडकल्याने कारचा असा चक्काचूर झाला होता.