कोल्हापूर : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा पातळीवरून क्षयरोगाचे रुग्ण तब्बल ४० टक्के कमी करण्यात यश मिळाल्याने कोल्हापूर जिल्हा क्षयरोग केंद्र, ग्रामीणला देशपातळीवरील रौप्यपदक मिळाले असून त्याचे वितरण आज, बुधवारी दिल्ली येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी दिली.
केंद्र व राज्य क्षयरोग विभाग आणि विविध शासकीय पाच संस्थांद्वारे निवडलेल्या गावांचे सर्वेक्षण, सन २०१५ ते २०२० पर्यंतची रुग्ण माहिती, व पडताळणी, खासगी टीबीविरोधी औषधे विक्री पडताळणी, शासकीय टीबीविरोधी औषधे वितरण पडताळणी, विविध मार्गदर्शक सूचनांनुसार निकषांची पडताळणी केल्यावर सन २०१५ च्या बेसलाईननुसार रुग्णसंख्येत ४० टक्के घट झाल्याने जिल्हा क्षयरोग केंद्र ग्रामीणला रौप्यपदक प्रमाणपत्र जाहीर झाले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. या पदकासाठी देशातून एकूण ७२ जिल्हे नामांकित झाले होते. महाराष्ट्रातून ११ जिल्हे नामांकित झाले होते. त्यापैकी कोल्हापूर ग्रामीणचे ब्राँझ प्रमाणपत्रासाठी नामांकन झाले होते. केंद्रीय पथकाने पूर्ण पडताळणी करून रौप्यपदक जाहीर केले. जिल्ह्यातील वीस गावांतील पाहणी करून ही निवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांचे सहकार्य लाभले. क्षयरोग पर्यवेक्षक, एलटी तसेच सर्व तालुकास्तरीय व आरोग्यवार्धिनी ग्रामीण रुग्णालय स्तरावरील अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासह जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
मार्चपर्यंतची रुग्णसंख्या
कोल्हापूर ग्रामीण : ४६९
महापालिका : ५००