जिल्हाधिकारी - पुनर्वसनाबाबतची भूमिका रास्तच
नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीला वारणेच्या पुराचा सर्वाधिक फटका बसतो. गावाच्या पुनर्वसनाबाबतीत गावकऱ्यांच्या भावना रास्तच आहेत. निलेवाडीकरांच्या जनभावना शासनाला कळवून पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील गावाच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत ग्रामस्थांची बैठक झाली. खासदार धैर्यशील माने व आमदार राजूबाबा आवळे प्रमुख उपस्थित होते.
निलेवाडी गाव पूरबाधित असून गावाचे पुनर्वसन व्हावे व विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक बनले होते. आमदार राजूबाबा आवळे व खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमवेत निलेवाडी ग्रामस्थांची बैठक झाली. ग्रामस्थांच्या व्यथा जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या.
पुनर्वसन करताना ते कोणत्या निकषावर केले पाहिजे, याची चर्चा केली. आमदार राजूबाबा आवळे यांनी, सर्व गावाचे पुनर्वसन करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा, असे सांगितले. खासदार धैर्यशील माने यांनी, निलेवाडीचे पुनर्वसन सोप्या पद्धतीने कसे करता येईल याची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली. आमदार व खासदार यांनी, निलेवाडी ग्रामस्थांच्या जनभावनेचा आदर करून प्रशासनाने लवकरच पुनर्वसन प्रश्न सोडविण्याचा आराखडा तयार करावा, अशी सूचना मांडली.
यावेळी विनयरावजी कोरे दूध व पतसंस्थेचे संस्थापक बाबासाहेब माने, माजी सरपंच सुभाष भापकर, उपसरपंच तानाजी जाधव, माजी उपसरपंच वसंत खोत, जयभवानी दूध संस्थेचे अध्यक्ष शहाजी बोरगे, हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष माणिक घाटगे, मानसिंग घाटगे, संतोष जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी:
कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत चर्चा करताना खासदार धैर्यशील माने व आमदार राजूबाबा आवळे. सोबत बाबासाहेब माने, सुभाष भापकर व निलेवाडीचे ग्रामस्थ.