कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव झाला नाही. यामुळे हा सोहळ्या पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या भाविकांची निराशा झाली.
श्री अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. वर्षभरापूर्वीपर्यंत हा सोहळा ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारीला होत होता. आता देवस्थान समितीने किरणोत्सवाचा कालावधी पाच दिवसांचा जाहीर केल्याने शुक्रवारपासून या सोहळ्याला सुरुवात झाली. तो भाविकांना पाहता यावा, यासाठी मंदिराच्या आवारात मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. सध्या थंडी असल्यामुळे सुर्यास्त लवकर होतो. शिवाय वातावरणात आर्द्रता व धुक्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे सायंकाळी सव्वापाचनंतर किरणोत्सवाला सुरुवात होते. मात्र, पाच वाजताच वातावरण ढगाळ झाले. मावळतीच्या किरणांनी कसेबसे अंबाबाईचा पितळी उंबरा गाठला व त्यानंतर ती लुप्त झाली. यामुळे भाविकांची निराशा झाली.
--