कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गालाकोल्हापूर जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीतही विरोधाचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. म्हणून बाधित शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तीपीठला माझाही विरोध कायम आहे, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग होईल, अशी घोषणा केली. त्याच सरकारमधीलच मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापुरातून शक्तीपीठ जाण्याला थेट विरोध केला आहे. यामुळे शक्तीपीठ प्रकरणी सरकारमध्येच भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठला विरोध असल्यानेच विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिसूचना रद्द करून घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारले. त्यावेळी जिल्हयातून शक्तीपीठला विरोध आहे, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तीपीठ सर्वांना विश्वासात घेवूनच केले जाईल, असे आश्वासन दिले.
शक्तीपीठ महामार्गाला विरोधच - मंत्री हसन मुश्रीफ; मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही दिली माहिती
By भीमगोंड देसाई | Updated: February 27, 2025 15:38 IST