गडहिंग्लज : निपाणीमार्गे गडहिंग्लज-कोल्हापूर महाराष्ट्राच्या बसफेऱ्यांना कर्नाटकने बंदी घातली आहे. त्या पूर्ववत सुरू करण्यास बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती न दिल्यास कर्नाटकच्या बसगाड्या कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत घेऊ नका, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून निपाणीमार्गे गडहिंग्लज-कोल्हापूर बसफेऱ्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे गडहिंग्लज-आजरा-चंदगडच्या प्रवाशांना गोरंबे-कागलमार्गे कोल्हापूरला जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडाबरोबरच वेळेचा अपव्ययही होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखालील गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे, रोज काळभैरी-निपाणीमार्गे कोल्हापूर या मार्गावर गडहिंग्लज, आजरा व चंदगड आगारांच्या सुमारे ५० बसफेऱ्या होतात. कोरोनाच्या नावाखाली कर्नाटकच्या हद्दीत जाण्यास महाराष्ट्राच्या बसगाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे केवळ एस.टी.वर अवलंबून असलेल्या प्रवाशांना नाहक त्रास दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात, अरळगुंडीचे माजी सरपंच चेतन लोखंडे, तारेवाडीचे माजी सरपंच अजित तुरटे, किणीचे उपसरपंच सखाराम केसरकर, झुलपेवाडीचे भिकाजी पाडेकर, बसर्गेचे मारुती गोणी यांचा समावेश होता.