(डमी पाठवली आहे. नियोजनातील विषय)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १७ गावांमध्ये आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने पेच निर्माण झाला आहे. सरपंच निवडीची सभा मंगळवारी नऊ तारखेला असून, त्या पार्श्वभूमीवर गावागावांत फोडाफोडीचे राजकारण सुुरू आहे. त्यांपैकी काही गावांमध्ये त्या प्रवर्गाचा विजयी उमेदवारच नाही; तर काही गावांमध्ये बहुमत नसलेल्या गटाकडे तो उमेदवार असल्याने बहुमत एका गटाला आणि सरपंच दुसऱ्या गटाचा अशी स्थिती निर्माण होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदा राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर म्हणजेच २७ जानेवारीला तालु्क्याच्या ठिकाणी झाले. या आणि पुढील कालावधीत मुदत संपलेल्या अशा १ हजार २५ ग्रामपंचायतींचे हे आरक्षण काढण्यात आले. त्यापैकी निवडणूक झालेल्या १७ गावांमध्ये सरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे. नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे, अशा गावांची माहिती सध्या जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र सरपंच निवडीच्या सभेनंतरच सर्व गावांमधील चित्र स्पष्ट होऊन त्यावर नंतर निर्णय दिला जाणार आहे.
---
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ४३३, निवडून आलेले सदस्य : ४ हजार २७
---
या गावांमध्ये पेच
गाडेगोंडवाडी, खटांगळे, उपवडे, भामटे कांगणी व चिंचणी (करवीर), बसर्गे, अरळगुंडी, मुत्नाळ (ता. गडहिंग्लज), वाठारतर्फ वडगाव, पट्टणकोडोली (हातकणंगले), किणे (आजरा), घोसरवाड, दत्तवाड, जैनापूर, शिरदवाड (शिरोळ), सुळकूड (ता. कागल).
--
काठावरच्या बहुमतात फोडाफोडी
काही गावांमध्ये निवडून आलेल्या दोन गटांमध्ये केवळ एका सदस्याने बहुमताचा फरक आहे. बहुमत मिळालेल्या गटात ५, तर विरोधी गटात ४ सदस्य निवडून आले आहेत. आरक्षण पडलेला उमेदवार विरोधी गटात आहे. अशा काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण होत आहे.
--
पुढे काय होणार?
ज्या गावांमध्ये आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार बहुमत असलेल्या किंवा नसलेल्या गटातदेखील नाही, तेथे नव्याने आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. ज्या गावांमध्ये अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण आहे; पण स्त्री उमेदवार नसेल त्या ठिकाणी त्याच आरक्षणाच्या पुरुषाला सरपंचपद मिळू शकते. काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत फोडाफोडीचे राजकारण झाले तर विरोधी गटातील सदस्य सरपंच होऊ शकतो. या सगळ्या घडामोडी मात्र ९ तारखेच्या सरपंच निवडीच्या सभेनंतरच होतील.
---