कोल्हापूर : महापालिकेकडून घरफाळा आणि पाणीपट्टीत वाढ केल्यास जनआंदोलन करू, असा इशारा बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे किसन कल्याणकर, रामेश्वरी पत्की यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
शहरातील घरफाळा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव देण्यात येत आहे. वास्तविक कोरोनाच्या संकटातही सर्वसामान्य जनतेने घरफाळा आणि पाणीपट्टी भरून महापालिकेस सहकार्य केले आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांची किरकोळ बिल थकले तर कनेक्शन कट करण्याची कारवाई होते. दुसरीकडे धनदांडग्यांनी कोट्यवधी रुपयांची बिल थकवली असून त्यांना मात्र सवलत देण्याचा घाट घातला आहे. बहुतांशी वेळी पाणीपुरवठा बंद, अपुरा पाणीपुरवठा असतो. असे असताना केवळ थकबाकी वसुली न करता दरवाढ करण्याचा पर्याय पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे.
घरफाळा संबंधात हिच स्थित आहे. येथील घोटाळा राज्यभर गाजला असून भोंगळ कारभारामुळे करबुडवे उजळमाथ्याने फिरत आहेत. घोटाळ्यातील रक्कम आणि थकबाकी वसूल करावी. घरफाळा आणि पाणीपट्टी वाढ करून जनतेचा रोष ओढावून घेऊ नये. सातारा नगरपरिषदेप्रमाणे कर माफ करता येतो का यासाठी प्रयत्न करावा.