कळंबा : शहरालगतची सर्व उपनगरे आणि कळंबा पाचगावसह लगतच्या ग्रामीण भागांना जोडणारा वाहतुकीच्या वर्दळीचा रस्ता असणाऱ्या संभाजीनगर चौकात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. अवजड वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने एकाचवेळी रस्त्यावर एकत्र आल्याने येथे वाहतुकीची कोंडी होऊन किरकोळ अपघाताच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना येथील रस्ता पार करताना जीव मुठीत घेऊनच रस्ता पार करावा लागतो.
परिसरात कळंबा जेल, आयटीआय संभाजीनगर बसस्थानक, विविध शाळा, मंगल कार्यालये, हॉटेल्स, बँका व अन्य व्यावसायिक कार्यालये असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प होते. येथे असणारे सिग्नल विक्रेते, गारगोटी वडापधारकांच्या अतिक्रमणात हरवले आहेत. शिवाय पदपथही अतिक्रमणातून सुटले नाहीत.
स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग पट्टे यांचा अभाव असल्याने वाहतुकीची शिस्त कोलमडून जाते. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडी टाळणे गरजेचे आहे.