कोल्हापूर : महापालिकेने शहराच्या विकासासाठी जागा आरक्षित केल्या आहेत. या जागा आरक्षित असल्याचे फलक लावा, अशा मागण्यांचे निवेदन उज्ज्वल कोल्हापूर संघटनाच्यावतीने महापालिका प्रशासनास दिले. राजकीय दबावाला न जुमानता आरक्षित जागांवरील अतिक्रमण हटवा, असेही यामध्ये म्हटले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने विकास योजनेत शहरातील ३८६ जागा आरक्षित केल्या असून, त्यापैकी १८७ कायम आरक्षित केल्या आहेत. या जागांवर रि.स.नंबर व सि.स.नंबर नाहीत. या ठिकाणी फलक नसल्यामुळे अतिक्रमण होत आहे. काही जागा हडप केल्याचे दिसून येतात. प्रशासनाचे नियोजन नसल्याने किंवा अंकुश ठेवला नसल्यामुळे ही स्थिती झाली आहे. अशा जागांवर फलक तत्काळ लावावेत. येथे अतिक्रमण अथवा बंधकाम झाले असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी करावी. नागरिकांच्या माहितीसाठी आरक्षित जागांची यादी प्रसिद्ध करावी.