कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद म्हणजे सोनेरी मुकुट आहे आणि तो मी नुसता मिरवण्यासाठी घातलेला नाही, तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी घातलेला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील यांची, तर ‘गोकुळ’च्या संचालकपदी बाळासाहेब खाडे यांची निवड झाल्याबद्दल भोगावती साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कामगार, अधिकारी, तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पी. एन. पाटील हे होते. सत्कारमूर्तीचा कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून जिह्यातील प्रत्येक गावागावांत काम पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
आ. पी. एन. पाटील म्हणाले, राज्यात व देशात साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे. साखर उद्योगाला ऊर्जितावस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे. सध्या साखरेला चांगला दर मिळत नसल्याने खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
स्वागत-प्रास्ताविक उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी संचालक पी. डी. धुंदरे यांचेही भाषण झाले. यावेळी ज्येष्ठ संचालक ए. डी. पाटील, प्रा. ए. डी. चौगले, हिंदुराव चौगले, बी. आर. पाटील, रवींद्र पाटील, सरपंच सुभाष पाटील, कार्यकारी संचालक संजय पाटील, तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील, धीरज डोंगळे, शहाजी कवडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले, तर आभार संचालक प्रा. सुनील खराडे यांनी मानले.