कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडीप राहिली. गगनबावडा तालुक्यात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप पिकाला सध्या पावसाची गरज असून माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके अडचणीत आली आहे. शनिवारी जिल्ह्यात एक-दोन सरी वगळता कडकडीन ऊन राहिले. गगनबावडा तालुक्यात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणातून १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत घट होत असून पंचगंगेची पातळी १२ फुटांपर्यंत आली आहे.