गणपती कोळी
कुरुंदवाड : येथील पालिका निवडणुका पक्षीय असले तरी गटालाच महत्त्व आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष जयराम पाटील गट विरुद्ध माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे गट अशीच पारंपरिक लढत होणार हे निश्चित आहे. मात्र, रावसाहेब पाटील गट कोणती भूमिका घेतो यावरच गटनेत्यांचे वर्चस्व राहणार आहे.
शहरात रावसाहेब पाटील, जयराम पाटील व रामचंद्र डांगे अशा तीन गटनेत्यांचे शहरावर वर्चस्व आहे.
तीनही नेत्यांचे शहरावर पकड मजबूत असल्याने पालिका निवडणुकीत आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही गटाला एकतर्फी बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शहराला त्रिशंकुचा शापच असल्याची टीका होते. त्याचा परिणाम नेत्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत फुटाफुटीचे राजकारण होत असते.
गतनिवडणुकीत गटातटांच्या राजकारणाला छेद देत पक्षीय चिन्हावर निवडणुका झाल्या. त्यामध्ये भाजपचे डांगे, काँग्रेसचे जयराम पाटील तर राष्ट्रवादी चिन्हावर रावसाहेब पाटील गटाने तिरंगी निवडणूक लढविली. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत जयराम पाटील यांनी बाजी मारली.
निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करत भाजपला सत्तेबाहेर ठेवले. नगराध्यक्ष पाटील यांच्या वयोमानामुळे फारसे क्रियाशील राहिले नाहीत. त्यामुळे लक्षात राहण्यासारखी विकासकामे करण्यात फारसे यश आले नाही शिवाय आघाडीतील कुरघोडीचे राजकारण झाल्याने सत्ताधारी आघाडीत सत्ता स्थापनेच्या वर्षभरातच फूट पडली. पालिकेत आघाडी सत्तेत असली तरी बिघाडी कायम आहे.
यंदाच्या निवडणुकीत पक्षापेक्षा पुन्हा गटाचीच निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नगराध्यक्ष पाटील व डांगे गट गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत झाले आहेत. तर रावसाहेब पाटील गट ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.
शहर काँग्रेसने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सापत्न वागणूक देत असल्याने शहरातील रावसाहेब पाटील गट काँग्रेसच्या पक्ष:पातीपणा भूमिकेवर नाराज आहेत शिवाय डांगे गटनेते रामचंद्र डांगे यड्रावकरांच्या संपर्कात अधिक आल्याने डांगे यांनी पालिका निवडणूक यड्रावकर गट व समविचारी गटाला घेऊन आघाडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला सत्ता टिकविण्याचे तर डांगे यांना सत्ता मिळविण्याचे आव्हान राहणार आहे.
-
पालिकेतील बलाबल
काँग्रेस - ६
राष्ट्रवादी - ५
भाजपा - ५
अपक्ष - १
लोकसंख्या - २५०००
मतदारसंख्या - १४०००
प्रभाग - १७
----------------
चौकट -
घडलंय बिघडलंय
* पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या चार वर्षांत समन्वयाचा अभाव.
* पाच वर्षांत नजरेत भरेल असे कोणतीही कामे नाहीत.
* शहराची सुधारीत नळ पाणीपुरवठा योजना निधी असूनही मार्गी लावण्यात अपयशी
* शहरातील अतिक्रमणे नियमित करणाचा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित.
* भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
* गेल्या दोन वर्षांपासून शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यात अपयशी.
फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०२-कुरुंदवाड नगरपालिका