कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरात राबविण्यात येणार असलेल्या राज्यस्तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेबाबत आज, मंगळवारी नगरविकासमंत्री यांच्या दालनात बैठक होत असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
शहरांतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास याअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता १८९.५५ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत मंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून मंजुरी देण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
मर्यादित उत्पन्न स्रोतामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशातच सन २०१९ आणि सन २०२१ च्या अतिवृष्टीमुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून वाहणाऱ्या पंचगंगा नदी व त्यास जोडणाऱ्या नाल्यांमुळे शहरास महापुराचा फटका बसला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुमारे ८२ प्रभागांपैकी सुमारे ३५ प्रभाग महापुराच्या पाण्याने बाधित झाले होते. त्यामुळे या पूरबाधित प्रभागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, नागरिकांना यातून वाहतूक करणे जिकिरीचे होत आहे. सदर निधीद्वारे शहरातील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ यांचा सुनियोजित विकास करणे शक्य होणार असल्याने या प्रस्ताव शासन दरबारी मंजूर होण्याकरिता प्रयत्न असणार असल्याची माहितीही क्षीरसागर यांनी दिली.