कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांत जीवनावश्यक वस्तूंची विक्री ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. येथील वस्तूंची किंमत खुल्या बाजारपेठेपेक्षा कमी असेल. यासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे आणि संघाने प्रमाणित केलेल्या स्वदेशी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री शहरातील १७०, तर जिल्ह्यातील १६०० रास्त भाव दुकानांतून होईल.
रास्त भाव दुकानात कपडे धुण्यासाठीचा साबण, चंदन साबण, मध, गुलकंद, आमसोल, खोबरेल तेल, बदाम तेल, हर्बल तेल, पापड आदी जीवनावश्यक वस्तूंसह चादरी, सतरंजी, पायपुसणी, घोंगडी, शबनम बॅग, टॉवेल, पायजमा, रूमाल, नॅपकीन विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या वस्तू विक्रीमुळे संघ आणि रास्त भाव दुकानांना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळेल. या वस्तू रेशनकार्ड धारकांसह इतर ग्राहकांनाही खरेदी करता येणार आहेत. पण रेशन घेताना या वस्तू खरेदी करण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.
पत्रकार परिषदेस संघाचे उपाध्यक्ष प्रकाश चौगुले, ज्येष्ठ संचालक सखाराम सुतार, संचालिका गीता गुरव, सविता देसाई उपस्थित होते.