जयसिंगपूर : प्रवाशांच्या सोयीकरिता कुरुंदवाड-मुंबई बससेवा सुरू केली असताना सांगली आगाराकडून ती बस रोखून धरण्यात आल्याने जयसिंगपूर येथील बसस्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सांगली आगाराच्या एस. टी. बसेस रोखून काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली आगाराचा निषेध केला.
दरम्यान, बसेस रोखणार नसल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कुरुंदवाड आगाराकडून मुंबईसाठी बससेवा सुरू केली आहे. मात्र, सांगली येथे बस गेल्यानंतर आगाराकडून ती रोखली जात असल्याने शनिवारी संतप्त झालेल्या काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगली आगाराचा निषेध करीत बसेस रोखून धरल्या. यावेळी कुरुंदवाड आगाराकडून सांगली आगाराशी समन्वय साधण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी एस. टी. प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. सांगली जिल्ह्यातील एकही बस जयसिंगपूर येथून पुढे जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी दोन्ही जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून मुंबई एस. टी. बससेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
यावेळी नितीन बागे, शैलेश आडके, सागर मादनाईक, तेजस देशमुख, रमेश यळगूडकर, शैलेश चौगुले, संतोष जाधव, मिलिंद भिडे, शंकर नाळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - १७०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील बसस्थानकात स्वाभिमानी, काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगली आगाराच्या बसेस रोखून आंदोलन केले.