कोल्हापूर : कोरोनाबाबतच्या नियमांचे कडकपणे पालन करून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये किमान तीन तास तरी सुरू करावीत, अशी मागणी उज्वल कोल्हापूर संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केली. शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.
एका बाजूला राजकीय सभा, मोर्चे, आंदोलने, लग्नसमारंभ हे कोरोनाबाबतचे नियम पायदळी तुडवून जोरात सुरू आहे. मग, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे अत्यावश्यक नाही का? विद्यार्थ्यांसाठी किती दिवस क्वॉरंटाईन राहणार? त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा आणि अन्य क्षेत्रातील महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी द्यावी. विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करावी. रोटेशन पद्धतीनुसार वर्ग भरवून संख्या मर्यादित ठेवावी. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने निवेदनाद्वारे दिला. या वेळी गणेश लाड, राहुल नाईक, किरण गायकवाड, अजित पाटील, सुनील सुतार, नीलेश आजगावकर, सागर टिपुगडे, रोहन कामते उपस्थित होते.
फोटो (०६०७२०२१-कोल-उज्वल संघटना) : कोल्हापुरातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन उज्वल कोल्हापूर संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.