उद्धव गोडसेकोल्हापूर : वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरचे अनेक राजकीय नेत्यांशी हितसंबंध होते. मुंबईपासून आजऱ्यापर्यंत मदतीला मित्रांचे जाळे होते. जवळ लाखो रुपयांची माया होती, तरीही तो गुन्हा दडपू शकला नाही. उलट पुरावे नष्ट करतानाच तो गुन्ह्यात अडकत गेला. खुनानंतर त्याने अश्विनी बिद्रे-गोरे यांचा मोबाइल वापरून त्या विपश्यनेसाठी उत्तर भारतात गेल्याचे त्यांच्या नातेवाइकांना भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात तो स्वत:च अडकत गेला आणि दीड वर्ष दडपलेल्या गुन्ह्याला वाचा फुटून तो शिक्षेपर्यंत पोहोचला.
पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर २००६ मध्ये रूजू झालेल्या अश्विनी बिद्रे यांचा २००९ पासून तत्कालीन पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्याशी संपर्क आला. सांगली येथे बदली झाल्यानंतर दोघांची ओळख झाली. त्यांच्यात वाढलेली जवळीकताच या गुन्ह्याला कारणीभूत ठरली. एप्रिल २०१६ मध्ये नवी मुंबईत कळंबोली पोलिस ठाण्यात कार्यरत असताना, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा ठाणे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुरूंदकर याच्याशी वाद झाला. त्यानंतर कुरूंदकर याने त्यांना भाईंदर येथील फ्लॅटवर नेऊन डोक्यात बॅटने मारून त्यांचा खून केला. त्यानंतर मित्र महेश फळणीकर आणि कारचा चालक कुंदन भंडारी यांच्या मदतीने वसईच्या खाडीत मृतदेहाची विल्हेवाट लावली.
शांत डोक्याने नियोजन करून त्याने गुन्हा केला. स्वत: पोलिस अधिकारी असूनही तो पुरावे लपवू शकला नाही. गुन्ह्यादरम्यान त्याचा मोबाइल सुरू होता. त्यामुळे त्याचे लोकेशन मिळाले. खुनानंतर त्याने स्वत: अश्विनी यांचा मोबाइल वापरला. त्यावरून त्यांच्या घरच्यांना व्हॉट्सॲप मेसेज केले. त्या विपश्यनेसाठी उत्तर भारतात जाणार असल्याने पुढील सहा महिने संपर्क होणार नसल्याचा मेसेज त्यांनी केला होता. गुन्हा दडपण्यासाठी केलेले प्रयत्नच त्याला कोठडीपर्यंत घेऊन गेले.
परिस्थितीजन्य पुराव्यांवर शिक्षाया गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. गुन्ह्यातील शस्त्र मिळाले नाही. अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह मिळाला नाही, तरीही आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात वकील आणि पोलिसांना यश आले. अश्विनी आणि कुरूंदकर यांच्यात मोबाइलवरून झालेले संभाषण, वादाचे काही व्हिडीओ, गुन्ह्यापूर्वी कुरूंदकरने खरेदी केलेली करवत, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो वसईच्या खाडीकडे गेल्याचे त्याचे गुगल लोकेशन पुरावे, म्हणून महत्त्वाचे ठरले.
फ्लॅटमध्ये रक्ताचे नमुने मिळालेअश्विनी यांचा खून केल्यानंतर कुरूंदकरच्या फ्लॅटमध्ये भिंतींवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने रंगकाम करून घेतले होते. तपास अधिकाऱ्यांनी भिंती खरवडून रक्ताचे नमुने मिळवले, तसेच शरीराचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमधूनही पोलिसांना रक्ताचे नमुने मिळाले होते.
Y आणि U मधील फरकखुनानंतर त्या जिवंत असल्याचे भासवण्यासाठी कुरुंदकर अश्विनी यांच्या मोबाइलवरून त्यांच्या घरच्यांना मेसेज करत होता. अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे यांना पाठवलेल्या एका मेसेजमध्ये त्याची Y आणि U मधील विसंगती लक्षात आली. अश्विनी या नेहमी You असे लिहिताना केवळ U असे अक्षर वापरत होत्या. कुरूंदकर याने केलेल्या मेसेजमध्ये Y असे लिहिल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.
ही कसली मानसिकता..?बिद्रे यांचा कुरूंदकर याच्यावर लग्नासाठी प्रचंड दबाव होता. कुरूंदकर याची त्यासाठी तयारी नव्हती. अशा कोंडीत तो सापडला होता. त्यातूनच वाद वाढत गेला. कुरूंदकरने लग्नास नकार देऊन शांत राहिला असता, तर बिद्रे पोलिसांत गेल्या असत्या आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असता. त्यातून जी काय बदनामी झाली असती तेवढ्यापुरताच हा विषय मर्यादित राहिला असता, परंतु कुरूंदकर त्या वाटेने न जाता बिद्रे यांचे जीवनच संपवले आणि स्वत:च्या करिअरची आणि आयुष्याची माती करून घेतली.
घटनाक्रम
- २००५ - अश्विनी बिद्रे आणि राजू गोरे यांचा विवाह.
- २००६ - स्पर्धा परीक्षेतून अश्विनी उपनिरीक्षक बनल्या.
- २००६ - पहिले पोस्टिंग पुणे येथे मिळाले.
- २००९ - सांगली येथे बदली. (इथेच कुरूंदकर याच्याशी ओळख.)
- २०११ - रत्नागिरी येथे बदली.
- २०१५ - नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात बदली.
- ११ एप्रिल २०१६ - अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या. (त्याच रात्री मीरा-भाईंदर येथील कुरूंदकरच्या फ्लॅटवर त्यांचा खून.)
- १२ एप्रिल २०१६ - कुरूंदकरने मित्रांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत टाकले.
- ३१ ऑगस्ट २०१६ - बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी नवीन मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन तक्रार केली.
- ४ ऑक्टोबर २०१६ - कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात धाव.
- ऑक्टोबर २०१६ - एसीपी संगीता अल्फान्सो यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती.
- ३१ जानेवारी २०१७ - कुरूंदकर याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल.
- डिसेंबर २०१७ - कुरूंदकर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक.
- २८ फेब्रुवारी २०१८ - महेश फळणीकर याच्याकडून गुन्ह्याची कबुली.
- २ मार्च २०१८ - कुरूंदकर याच्याकडून गुन्ह्याची कबुली.
- मार्च २०१८ ते एप्रिल २०१५ - खटल्याची सुनावणी.
- ५ एप्रिल २०२५ - पनवेल न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवले.
- ११ एप्रिल २०२५ - फिर्यादी आणि आरोपींच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले.
- २१ एप्रिल २०२५ - आरोपींना जन्मठेप आणि कारावासाची शिक्षा.