कोल्हापूर : गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेत समावेश असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे केली. मात्र, निवेदन स्वीकारण्यासाठी चव्हाण उपस्थित नसल्याने या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याचदरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याठिकाणी आले. परंतु, ते थेट यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे गेले तर शिवसेनेचे पदाधिकारी तेथून निघून गेले.
देवणे व पवार हे निवेदन घेऊन जिल्हा परिषदेत आले. याचदरम्यान मुश्रीफ याठिकाणी येणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण हे प्रोटोकॉलनुसार खाली आले. यावेळी चव्हाण यांनी निवेदन घेण्याचे नाकारल्याचा समज झाल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच घोषणाबाजी सुरू केली आणि काचेच्या दरवाजावर निवेदन चिकटवले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निदर्शने करत मागण्यांचे निवेदन मुख्य प्रवेशद्वाराजवळ चिकटवल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेमध्ये उचगाव, गडमुडशिंगी, गोकुळ शिरगाव यासह एकूण १३ गावांचा समावेश आहे. मात्र, काही गावांची पाणीपट्टी थकीत असल्याने या गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा पाणीपुरवठा खंडित करू नये, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राजू यादव, शशिकांत बिडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. हे सर्व सुरू असतानाच आलेले मुश्रीफ थेट कार्यक्रमाकडे गेले. त्यामुळे शिवसेना पदाधिकारीही त्यांना न भेटताच बाहेर पडले.
१२०३२०२१ कोल शिवसेना ०१
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निवेदन न स्वीकारल्याच्या समजातून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी निवेदन काचेवर चिकटवले.
छाया आदित्य वेल्हाळ