कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदल होणार आहे; पण अध्यक्षपदाबाबत मात्र काहींना विस्मरण झाले आहे, असा चिमटा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून अध्यक्षपदावरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता २३ मार्च रोजी अर्थसंकल्पाची सभा झाल्यानंतर पदाधिकारी बदलाची मोहीम सुरू होईल असे मानले जाते.
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी मुश्रीफ शुक्रवारी जिल्हा परिषदेत आले होते. कार्यक्रमानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पदाधिकारी बदल होणार आहे. शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतरच बदल होणार होता; परंतु तो काही कारणांमुळे झाला नाही. आता अधिवेशन झाले आहे. बसून निर्णय घेऊ. अध्यक्षपद नेमके कोणत्या कॉंग्रेसकडे अशी विचारणा केली असता ते म्हणाले, याबाबत काहींना विस्मरण झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांना उद्देशून त्यांनी हा चिमटा काढला होता. त्यामुळे अध्यक्षपदाबाबत दोन्ही कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोकुळची निवडणूक लागली तरी हा बदल होणार आहे.
मुश्रीफ म्हणाले, सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याची मर्यादा ३ लाखांवरून १० लाख केली आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होईल. शासनानेच तीन लाखांवरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने आता जिल्हा बँकेला नियमित कर्जफेड करणाऱ्यांना रिबेट द्यावा लागणार आहे.
चौकट
ही जिल्हाधिकाऱ्यांची चूकच
कोरोनाकाळातील खरेदीबाबत ज्या चर्चा माझ्या कानावर येत होत्या, त्याच वेळी मी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना बोललो होतो. त्यावेळी त्यांनी त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज होती. परंतु त्यांनी ते घातले नाही. ही त्यांची चूकच आहे असेही मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले. हा सर्व कारभार अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी नको असे माझे मत आहे, असे मुश्रीफ म्हणाले.