येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना उपचार केंद्रात रुग्ण संख्या कमी झाल्याने ते बंद करून येथील रुग्णसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. यासह अन्य मागण्यांचे निवेदन आज तहसीलदार मीना निंबाळकर यांना देण्यात आले.
कोरोना रुग्ण वाढल्यावर उपचार केंद्र सुरू करण्यासाठी तेथील रुग्णसेवा बंद करून तात्पुरत्या स्वरूपात कन्या विद्यामंदिर येथे सुरू केली आहे.
आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे निवासी शाळेतील केंद्र पुरेसे आहे. व्यापाऱ्यांना अग्रक्रमाने लसीकरण करावे. राधानगरी, दाजीपूर रस्त्याचे रेंगाळलेले काम लवकरात पूर्ण करावे, तसेच राधानगरीसाठी पूर्ण वेळ तलाठी व कृषी सहायक नाहीत. त्यांची नेमणूक करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी अध्यक्ष सतीश फणसे, संतोष कावळे, संजय भाळवणकर, उमेश पोवार, महेश मोरये, बबलू माळगावकर, दत्तात्रय पोतदार आदी उपस्थित होते.