कोल्हापूर : कोरोनावर नियंत्रण मिळवतानाच लसीकरण करून घेऊन नागरिकांना सुरक्षित करण्याची जबाबदारी पार पाडत माणगाव (ता. हातकणंगले), वडणगे (ता. करवीर), बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) आणि कवठेसार (ता. शिरोळ) यांनी वेगळेपण जपले आहे.
या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून गुरुवारी झालेल्या सरपचांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सर्वांना आपले अनुभव सांगितले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही या सरपंचांचे कौतुक करत त्यांच्या कामाचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे.
माणगावचे सरपंच राजू मगदूम म्हणाले, पहिल्यांदा गावातील रस्ते बंद केले. तीन शिफ्टमध्ये सदस्य नेमले. गावातील सर्व डॉक्टर्सना विनंती करून रुग्ण तपासणी सुरू केली. ग्रामपंचायत आणि वैष्णवी ट्रस्टतर्फे रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. घरात मास्क, सॅनिटायजर पुरवले. विनाकारण फिरणाऱ्या, कट्ट्यावर फिरणाऱ्यांना ८१ हजार रुपयांचा दंड केला. रोजच्या गावातील कोरोना रुग्णांच्या स्थितीची माहिती ८००० ग्रामस्थांना एकाचवेळी माहिती दिली जाते.
वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, पहिल्या लाटेत गृह अलगीकरणाचा वडणगे पॅटर्न विकसित झाला. दुसऱ्या लाटेवेळी गाव मोठे असल्याने आम्ही प्रत्येक प्रभागाची वेगळी समिती करून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली. सामूहिक सहकार्यातून कोविड सेंटर सुरू केले. सध्या गावात ११० रुग्ण असले तरी त्यातील ७५ रुग्ण घरांमध्येच वास्तव्यास आहेत. शासनाच्या सर्व सर्वेक्षणापासून ते औषधफवारणीपर्यंत सर्व बाबतीत सातत्य ठेवले.
कवठेसारच्या सरपंच दीपाली भोकरे म्हणाल्या, गावातील ६८ पैकी ५० रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचे १०० टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हायरिस्कमधील व्यक्तींना स्वॅब तपासण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे वाहतूक व्यवस्था करण्यात आली. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या अलगीकरणासाठी भोकरे हायस्कूलच्या इमारतीमध्ये साेय करण्यात आली. ४५ च्यावरील ४२३ पैकी ४४७ जणांचे लसीकरण करून घेतले.
बेळगुंदीचे सरपंच तानाजी रानगे म्हणाले, गावातील ४५ वर्षांवरील केवळ आठ लोकांना लसीकरण राहिले आहे. उर्वरित सर्व लसीकरण दहा किलोमीटरवर असणाऱ्या महागाव आणि नंतर इंचनाळ येथे करून घेतले. यासाठी वाहतूक व्यवस्था केली. बाहेरून येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली. आल्यानंतर शाळेत चार दिवस अलगीकरण सक्तीचे केले. लसीकरण न करणाऱ्यांना रेशन आणि पाणी बंद करण्याचा इशारा दिला. त्याचा चांगला परिणाम झाला.
चौकट
चार गावांचे वेगळेपण...
पहिल्या लाटेवेळी अनेक ग्रामपंचायतींनी खमकी भूमिका घेत उत्तम कामगिरी केली होती; परंतु दुसऱ्या लाटेवेळी तोच वाईटपणा घ्यायला अनेक ग्रामपंचायतींचे पदाधिकारी पुढे आले नाहीत. गृह अलगीकरणाची शिस्त पाळली गेली नाही. शाळांमध्ये सोय केली गेली नाही. फिरणाऱ्यांवर बंधने घातली नाहीत. परिणामी कोरोना वाढत गेला. या पार्श्वभूमीवर या चार गावांचे वेगळेपण उठून दिसते.
कोट
संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही गतवर्षीपासून कोरोनाकाळात काम करत आहोत. प्रवेशबंदीपासून ते दंडापर्यंत अनेकवेळा ठाम भूमिका घेतली. ही भूमिका ग्रामस्थांच्या हिताची असल्याने त्याला ग्रामस्थांनी पाठबळ दिले.
राजू मगदूम, सरपंच, माणगाव
०४०६२०२१ कोल राजू मगदूम
कोट
करवीर तालुक्यातील मोठे गाव म्हणून वडणगेची ओळख आहे. कोल्हापूर शहराशेजारी असल्याने ये-जा नियंत्रित करताना कसरत करावी लागली. परंतु गृह अलगीकरणाचा पॅटर्न यंदाही प्रभावीपणे राबवला. ग्रामस्थांचाही चांगला प्रतिसाद आहे.
सचिन चौगले, सरपंच, वडणगे
०४०६२०२१ कोल सचिन चौगले