काेल्हापूर : हिरवाईतून समग्र अखंड भारताच्या एकात्मतेचे दर्शन घडवण्याच्या उद्देशाने कोल्हापुरात वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनने राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात ३२ राज्यांसह सुजलाम् सुफलाम् भारत अवतरला. टाकाळा येथील उद्यानात देशातील ३२ राज्यांची प्रमुख ओळख असलेल्या झाडांची रोपे लावण्यात आली.
मंगळवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राबवलेल्या या उपक्रमात वृक्षप्रेमी, पर्यावरण स्नेही ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, तरुण मंडळी सहभागी झाली. प्रत्येक राज्याची ओळख सांगणारे वृक्ष, त्या राज्याचा नकाशा आणि अखंड भारताची प्रतिकृती अशा भारावलेल्या वातावरणात देशभरातील वृक्षांची रोपे कोल्हापुरात रुजण्यास सज्ज झाली. काश्मीरपासून ते केरळपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंतच्या देशातील ३६ पैकी ३२ राज्यातील वृक्ष आता येथे वाढताना, रुजताना, फळताना, फुलताना पाहायला मिळणार आहेत.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष अमाेल बुड्ढे, सतीश कोरडे, पर्यावरण तज्ञ सुहास वायंगणकर, अक्षय कांबळे, परिताेष उरकुडे, सविता साळुंखे, अर्चना चौगुले, विद्या पाथरे, रमेश जाधव, साजिद शेख, अभिजित गडकरी, तात्या गोवावाला, सचिन पोवार, सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, नेत्रपाल जाधव सहभागी झाले.
फोटो: २७०१२०२१-कोल-वृक्षप्रेमी ०१, ०२, ०३
फोटो ओळ: कोल्हापुरातील वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडून मंगळवारी प्रजासत्ताकदिनी टाकाळा येथील महापालिकेच्या उद्यानात देशभरातील ३२ राज्यांची ओळख सांगणाऱ्या रोपांची लागण केली.