कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रत्यय संस्थेच्यावतीने रविवारी सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ‘इडा पीडा टळो’ हा शेतकरी आंदोलनावरील ऑनलाईन कार्यक्रम झाला. ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या कथेचे अभिवाचन व गाण्यांचे सादरीकरण करीत दिल्लीतील आंदोलनाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला.
अन्नदाता शेतकरी देशाच्या राजधानीचे दार ठोठावत त्याचे गाऱ्हाण सांगायला उभा आहे. त्यांना आत घेऊन त्याला पाणी आणि गुळाचा खडा देण्याऐवजी हे सरकार या धरतीच्या लेकरांवर थंडगार पाण्याचे फवारे मारत आहे. तो आत येऊ नये म्हणून रस्ते खणून ठेवत आहे. रस्त्यांवर खिळे ठोकून प्रचंड मोठाली बॅरिकेड्स उभे करीत आहे. ‘इडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो’ असे म्हणणारी आपली संस्कृती, पण हे सरकार या बळीलाच गाडायला निघाले आहे. मंडळी, जागे होऊया, आपल्या भविष्यासाठी, आपल्या पोरांच्या भविष्यासाठी, अन्नदात्याच्या अस्तित्वासाठी जागे होऊया!, असा संदेश या कार्यक्रमातून संयोजकांनी दिला.
यावेळी आदित्य खेबुडकर, नीरज नारकर, संजय पाटील, आसावरी नागवेकर, रसिया पडळकर, स्वरा कलश, रणजित कांबळे या कलाकारांनी कथांचे सादरीकरण केले. नामदेव हसुरकर, गौतम कांबळे यांची त्यांना साथ मिळाली. रंगमंच व्यवस्था व चलचित्रण सुहास लकडे, संदेश सामंत, दीपिका पुरी यांनी केले. सिद्धी मिरजे, शेखर गुरव यांनी संकलन, तर निखिल कुलकर्णी यांनी कला रचना केली.