कोल्हापूर : देवीच्या जागरासाठी लातूरहून कोल्हापुरात आणलेल्या कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध घालून लुटल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके करण्यात आली आहेत. त्यापैकी एक पथक औरंगाबाद येथे गुरुवारी रवाना झाले.
मंगळवारी देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी राचन्नावाडी (लातूर) येथील स्त्री, पुरुष अशा नऊ जणांना जेवणात गुंगीचे औषध घालून बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. याच्या तपासासाठी लक्ष्मीपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषणने तीन पथकांची स्थापना केली. त्यापैकी एक पथक संशयिताचा शोध घेण्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाले आहे. तर दुसरे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी व तिसरे पथक फोन काॅल (सीडीआर) तपासासाठी तयार करण्यात आले आहे. गुंगीत असलेल्या नऊ जणांवर अजूनही सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असून इतर आठ जण बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. संशयिताने या कलाकारांना जागर कार्यक्रमासाठी अडीच हजार रुपये रोख न देता बँकेत भरले असल्याचे तपासात पुढे आले आहे.