जगभर १९७२ पासून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला जातो. निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्वही शून्यच असल्याची जाणीव असल्यानेच पर्यावरण टिकवण्यासाठी म्हणून या दिनाचे निमित्ताने का असेना, पण पर्यावरणाचा जागर होतो.
निसर्ग नेहमीच नि:स्वार्थीपणे देत राहतो, आपण मात्र त्याचा ऱ्हास करत राहतो, याची फळेही भोगतो, तरीदेखील यातून फारसा धडा घेतला जात नाही. त्यातूनच जल, वायू, हवा अशा प्रदूषणाने मानवासह संपूर्ण पर्यावरणीय संस्थेवरच आरिष्ट आणले आहे. याला वेळीच आवर घातला नाही, तर फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरणप्रेमी व तज्ज्ञांकडून वारंवार दिला जात असलातरी त्याकडे बहुतेक वेळा काणाडोळा केला जातो. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानेच यात पुढाकार घेत दरवर्षी एक वेगळी थीम घेऊन पर्यावरणाविषयीच्या जाणिवा अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न केले जातात.
जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, वृक्षतोड यामुळे पाऊसमानाचे बदललेले चक्र यावर संयुक्त राष्ट्रसंघाने लक्ष केंद्रित केले आहे. हे संकट एकट्या जागतिक स्वरूपाचे असलेतरी त्याला परिणाम मात्र प्रत्येक मानवांसह प्राण्यांवरही होणार असल्याने निदान पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तरी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने आपल्या खांद्यावर घेतला तरच हा दिन साजरा केल्याचे समाधान लाभणार आहे.