- दत्ता लोकरे कोल्हापूर - टाळ मृदंगाचा गजर.. ज्ञानोबा तुकाराम माउली ,राम कृष्ण हरीचा जयघोष..संताची विविध चलचित्रे ..अशा भक्तीमय वातावरणात राधानगरी तालुक्यातील सरवडे नगरी भक्तीमयरसात न्हाऊन निघाली होती. जगदगुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यासाठी देहु हुन आणलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या चल पादुकांचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सकाळी ६ वाजता शिवाजीराव खोराटे विद्यालयाच्या प्रांगणात पादुकांचे आगमन झाले.शोभायात्रेने भव्य सोहळ्याची सुरुवात झाली.
जगदगुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोतर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळयाला आजपासून सुरुवात झाली. २७ जानेवारी पर्यंत हा सोहळा चालणार आहे. आज या सोहळ्याचा पहिला दिवस होता. त्यानिमित्ताने देहूतून आणलेल्या संत तुकाराम महाराज चल पादुकांची भव्य शोभायात्रेने सुरुवात झाली..या शोभायात्रेत जिल्ह्यातील अनेक गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या.
अनेक शाळेचे मुले विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आदींच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. महिलांच्या फुगड्या लक्षवेधक होत्या. वारकर्याच्या टाळ मृदुंगाच्या गजरांनी सरवडे नगरी दुमदुमली होती. उंदरवाडी ग्रामस्थांची दिंडीतील घोड्यावरून आलेला शिवाजी महाराजांच्या चित्ररथाने लक्षवेदी होता. तर हजारो महिलांच्या डोक्यावरील कलश लक्ष वेधून घेत होता..शशीकांत गुळवणी यांनी तयार केलेला बालचमुंचा चित्ररथ तर भारतप्रेमी,विठ्ठलाई तालिम,नवनाथ तरुण मंडळाचे लहानमुलांचे लेझीम पथक , मर्दानी दांडपट्टा सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी सरपंच रणधिरसिंह मोरे,पत्नी संयोगिता मोरे,शशीकांत गुळवणी,पत्नी मंगला गुळवणी, युवराज वाईंगडे,पत्नी गौरी वाईंगडे आदि दाम्पत्यांच्या हस्ते पादुकांचे विधीवत पुजन करण्यात आले आणि शोभायात्रा सुरु झाली दुपारपर्यंत हा दिव्य भव्य सोहळा साजरा झाला. कार्यक्रम स्थळी पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. आणि सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.उद्यापासून २७ जानेवारी पर्यंत या सोहळ्यात भजन ,प्रवचन, किर्तन असे नित्याचे कार्यक्रम होणार आहेत.यावेळी सोहळा समितीचे अध्यक्ष रोहित सावंत,कार्याध्यक्ष शिवाजीराव वागवेकर ,सर्व पदाधिकारी ,जिल्ह्यातील व सिमाभागातील वारकरी ,महिला हजारो संख्येने उपस्थित होते.स्वच्छतेला विशेष महत्त्व या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या भाविकांना विविध मंडळाच्या वतीने केळी,सरबत,ताक,बिर्याणी आदींचे वाटप करण्यात आले.यावेळी रस्त्यावर पडत असलेला कचरा शिवाजी तरूण मंडळाकडून गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जात होते. या स्वच्छतेबद्दल भाविकांकडून कौतुक होत होते.