कोल्हापूर : आता थेट पंचवार्षिक निवडणुकीलाच सामोरे जावे लागणार असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज शुकवारची सभा विद्यमान कार्यकारिणीची अखेरची सभा असणार आहे. शेवट गोड व्हावा म्हणून सत्ताधाऱ्यांनीही लाडू, फराळासह जंगी तयारी केली आहे. तीन लाखांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्तीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आधीच डाव जिंकला आहे. आज दुपारी १ वाजता मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक मंदिरात फक्त कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळणार आहे.
भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेली आणि प्रशासकराज अनुभवलेल्या जिल्हा बँकेची सूत्रे हसन मुश्रीफ यांनी पाच वर्षांपुर्वी घेतली आणि बँकेने सक्षमतेच्या दृष्टीने एकेक पाऊल टाकण्यास सुरुवात केली. डबघाईला आलेली ही बँक आता १३० कोटींचा तोटा भरून काढत १३७ कोटींच्या ढोबळ नफ्यासह वेगाने पुढे झेपावू लागली आहे. २०१५ मध्ये २८९० कोटींच्या ठेवी आता ६ हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. नेटवर्थ १११ कोटींवरून ४८१ कोटींवर पोहोचला आहे.
तीन लाखांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्त देणारी ही बँक देशातील एकमेव ठरली आहे. आजच्या सभेत यावरून कौतुकाचा वर्षाव होणार आहे. संस्थाना लाभांश देऊन आधीच खुश केल्यानंतर आता सचिवांना पगार वाढीच्या निर्णयाची घोषणा हाेईल, अशी बँक वर्तुळात चर्चा आहे.