कोल्हापूर : व्यावसायिक, आस्थापना, दुकानदार यांच्याकडून कोरोनाच्या नियमांचा वारंवार भंग झाल्यास त्यांचा थेट एक महिन्यासाठी परवाना निलंबित करून फौजदारी केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
कोरोनाचे गांभीर्य वाढत असतानाही लोक अजूनही बेफिकीर असल्याने महापालिकेने कारवाईचा दंडुका उगारण्याचे ठरविले आहे. त्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्या म्हणाल्या, शहरात लग्न, बारसे, वाढदिवस, आदी कार्यक्रमांतून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे. कारवाई करून कोणाला नुकसान करण्याचा उद्देश नसून दुसरी लाट रोखण्याचा प्रयत्न आहे. यासाठी नियमभंग करणाऱ्यांचा दंडही वाढवला आहे.
भाजी विक्रेत्यांना हजार रुपये दंड
पूर्वी आस्थापना, दुकानदार आणि इतर आस्थापनांमध्ये मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे, भाजीपाला विक्रेत्यांकडे हँडग्लोव्हज नसल्याचे आढळून आल्यास आता ५०० रुपयांवरून एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. मंगल कार्यालयावर पूर्वी एक हजार रुपये दंड होता. आता तो दोन हजार रुपये केला आहे. कारवाईसाठी आठ पथके नियुक्त केली आहेत.
चौकट
दुकानदार, व्यावसायिकांवर अशी होणार कारवाई
प्रथम उल्लंघन केल्यास : एक हजार रुपये दंड
दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास : दोन तासांसाठी दुकान बंद
तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास : १५ दिवसांसाठी परवाना निलंबित
चौथ्यांदा उल्लंघन केल्यास : महिन्यासाठी परवाना निलंबित, फौजदारी
चौकट
केएमटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याबाबत विचारला असताना डॉ. बलकवडे यांनी प्रवाशींच संख्या जास्त असणाऱ्या मार्गावर बसेसची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्याचे सांगितले. खासगी रुग्णालयामध्ये कोरोना संशयित रुग्णांची माहिती देण्याचे बंधनकारक केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
सहकार्य करो अन्यथा कठोर कारवाई
महापालिकेने कोरोना संदर्भात सर्व्हेक्षणासाठी अथवा नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या पथकाला नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. पथक नागरिकांच्या आणि शहराच्या सुरक्षेसाठी येते. त्यांना सहकार्य केले नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. बलकवडे यांनी दिला.