लोकमत न्यूज नेटवर्क
सरूड : पावनगड या किल्ल्याचे इतिहास संशोधन व संवर्धन व्हावे यासाठी सदर पावनगड किल्ला वनखात्याच्या अखत्यारीतून काढून पुरातत्त्व खाते, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकारात देण्याविषयी कार्यवाही करावी, अशी मागणी माजी आ. सत्यजित पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पन्हाळा गिरीस्थान या ऐतिहासिक व शिवकालीन किल्ल्यालगत पावनगड हा किल्ला सध्या अस्तित्वात असून तो वनविभागाच्या अखत्यारित आहे. गुरुवार, दिनांक ४ फेब्रुवारी रोजी टीम पावनगड व स्थानिक लोकांना शिवकालीन तोफेसाठी वापरण्यात येणारे ४०० हून अधिक तोफगोळे आढळून आले. पावनगड या किल्ल्याचे इतिहास संशोधन व संवर्धन व्हावे अशी मागणी तमाम शिवप्रेमी, जनतेतून व इतिहासप्रेमींतून होत आहे. यासाठी पावनगड किल्ला वनखात्याच्या अखत्यारीतून काढून त्याचे हस्तांतर पुरातत्त्व खाते, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करणे गरजेचे असून यासंदर्भात संबंधितांना आपले तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणीही माजी आ. सत्यजित पाटील यांनी या पत्रातून केली आहे.