लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे एसटीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील बसेस जिल्ह्यातील बारा आगारातून सुरू आहेत. या सर्व बसेस फलाटावर लावण्यापूर्वी व प्रवासानंतरही प्रत्येक आगारामध्ये सॅनिटाइज केल्या जात आहेत. प्रवाशांनाही मास्क लावल्याशिवाय बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. या सेवेअंतर्गत कोल्हापूर ते गडहिंग्लज मार्गावर सर्वाधिक वाहतूक रोज होत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून राज्य शासनाने निर्बंध घालून कोरोना संसर्गाच्या परिस्थितीनुसार राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसेसना परवानगी दिली आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या लक्षणीय असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस परवानगी नाकारली आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील कोल्हापूर ते गडहिंग्लज,आजरा, कोल्हापूर ते मुरगुड, कोल्हापूर ते हुपरी, कोल्हापूर ते कागल, राधानगरी, शाहूवाडी या मार्गावरील बसेस सुरु आहेत. प्रवासी संख्याही मोजकीच असल्यामुळे या मार्गावर कोल्हापूर विभागातील विविध आगारांतून ४४ बसची सोय करण्यात आली आहे. बस फलाटवर लागण्यापूर्वी आणि प्रवास झाल्यानंतर या बसेस डेपोतील कार्यशाळेतून संपूर्णपणे सॅनिटाइज केली जाते. याशिवाय प्रवाशांनी तोंडाला मास्क लावला नाही तर त्यांना वाहक बसमध्ये प्रवेश देत नाही.
जिल्ह्यातील एकूण बसची संख्या -७८०
सध्या सुरू असलेल्या बसची संख्या -२२
एकूण कर्मचारी ४५००
वाहक -१५००
चालक -१५००
सध्या कामावर वाहक - २२
सध्या कामावर चालक -२२
सर्वाधिक वाहतूक या मार्गावर
अत्यावश्यक सेवेअंतर्गत कोल्हापूर-गडहिंग्लज मार्गावर सर्वाधिक प्रवाशांची मागणी आहे. या मार्गावरून आजरा, चंदगड येथपर्यंत जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसातून पाच फेऱ्या ये-जा होत आहे.गेले दोन दिवसांपासून पुणे सेवा सुरू केली आहे. या सेवेला प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
...अशी होते बस सॅनिटाइज
आगारातून बसेस फलाटवर लावण्यापूर्वी त्या कार्यशाळेतून त्या सॅनिटाइज केल्या जातात. प्रवाशी बसमध्ये चढण्यापूर्वी मास्क लावलेला नसेल तर वाहक त्यांना प्रवेश देत नाही. बसचा प्रवास ज्या स्थानकात होईल त्या ठिकाणी सॅनिटाइज करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत.
दीड महिन्यात ३२ कोटी ५ लाखांचा फटका
एसटीच्या कोल्हापूर विभागात १२ आगार आहेत. या आगाराद्वारे दिवसभरात विभागाला ६५ लाखांचे उत्पन्न रोज मिळते. मात्र, गेल्या ५० दिवसांपासून हे उत्पन्न पूर्णपणे बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील २२ बस सुरू आहेत. मात्र, त्यांचा इंधन खर्चही निघत नाही. केवळ सेवा म्हणून ही वाहतुक सुरु आहे. त्यामुळे शुक्रवार अखेर ३२ कोटी ५ लाखांचा फटका या विभागाला बसला आहे.
प्रवासी घरातच
जिल्हा प्रशासनाने गेल्या पन्नास दिवसांपासून संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लादले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणेसाठी दोन बस सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातून केवळ २५ प्रवासी गेले. परत येताना मात्र, प्रवासी मिळाले नाहीत. तर जिल्हा अंतर्गत सेवा पूर्णपणे बंद आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद
मी कोल्हापूर ते गडहिंग्लज असा प्रवास अत्यावश्यक सेवेत काम करीत असल्यामुळे प्रवास करतो. सकाळी गाडी भरल्याशिवाय सोडली जात नाही. कोरोनाचे सर्व नियमावली पाळून बसमध्ये प्रवेश दिला जातो. अनेकदा तासनतास प्रवासीच नसल्यामुळे थांबावे लागते. बस सुटल्यानंतर बरे वाटते.
- राजाराम लांजेकर, प्रवास
चालक प्रतिक्रिया
प्रवाशांसोबत आमच्याही जीवाला धोका आहे. बस डेपोतून बाहेर काढतानाच सॅनिटाइज केल्याची खात्री करून फलाटावर लावतो. प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देताना कोरोनासंबधी सर्व नियमावलीचे पालन केले जाते.
- कुलदीप हिरवे, चालक
०४०६२०२१- कोल एस टी डमी