कोल्हापूर : करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेने कडक भूमिका स्वीकारली आहे. सर्वच ग्राम पंचायतींना कोरोना काळातील नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून उचगाव आणि गडमुडशिंगी येथील दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
उचगाव गांधीनगर मार्गावर पाच दुकाने असून, या दुकानदारांना ४० हजार रुपयांचा दंड करण्यात आला तर एक दुकान सील करण्यात आले आहे. सकाळी ११ नंतर दुकाने उघडी ठेवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. याआधीही उचगाव ग्राम पंचायतीने दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सरपंच मालूताई काळे, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, तलाठी महेश सूर्यवंशी व ग्राम पंचायत सदस्यांनी कारवाईत भाग घेतला.
गडमुडशिंगी हद्दीतील गुरुनानक मार्केटमधील पाच दुकानांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहेत. सरपंच अश्विनी शिरगावे, उपसरपंच तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाढवे यांनी कारवाई केली.