लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : उदगावमधील ग्रामपंचायत सदस्यांनी आता निवडणुकीचा राग विसरून एकत्र येण्यावर जोर दिला आहे. सरपंच निवडीच्या अनिश्चित स्थगितीमुळे दोन्ही आघाड्यांची सहल शनिवारी परत गावी आली. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात कुरघोडी केलेले नेते एकत्रित दुचाकीने गावभर फिरत असल्याने कार्यकर्त्यांनी तोंडात बोटे घातली आहेत. त्यांच्या प्रभागातील फेऱ्या मतदारांना मात्र शहाण्या करून जाणार आहेत.
मोठ्या चुरशीने उदगावची निवडणूक रंगली होती. आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांनी प्रचारही गजबजला होता. सदस्यांची फोडाफोडी करून सरपंच निवडीला सामोरे जाण्याचा दोन्ही आघाड्यांनी चंग बांधला होता. परंतु, सरपंच निवड स्थगितीने पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. मोठी बडदास्त ठेवावी लागत असल्याने दोन्ही आघाड्यांनी सहलीवरील सदस्य गावात आणले आहेत. सध्या महाविकास आघाडीकडे नऊ तर स्वाभिमानीकडे आठ सदस्य आहेत. काठावरच्या बहुमताने दोघांनाही सदस्यांना आवर घालावा लागणार आहे.