गणपती कोळी --कुरूंदवाड --उसाचा गळीत हंगाम संपण्यापूर्वीच ऊसतोड मजुरांना गावाकडे परतीचा वेध लागलेला असतो़ यंदाचा गळीत हंगाम संपून आठवडा संपला तरी अनेक भागात ऊसतोड मजूर अद्याप गावातच आहेत़ गावाकडे पाणीच नसल्याने जनावरे कशी जगवायची म्हणून याच भागात राहून शेतीच्या कामाच्या शोधात आहेत़ कोल्हापूर जिल्हा पाण्यासाठी समृध्द असल्याने या भागात ऊस शेती मोठी आहे़ त्यामुळे या पिकांवर प्रक्रिया करणारे साखर कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. याउलट इंडी या भागातील शेतकऱ्यांची शेती मोठी असूनही शेतीसाठी पाण्याची कमतरता असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी मजुरी मिळविण्यासाठी ऊसतोडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सहा ते सात महिने जनावरे व कुटुंबाला घेऊन ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतर करत असतात़मजूरांच्या गावाकडे शेतीवाडी असूनही पाण्याअभावी पावसाळी पिकेच घेतली जातात़ संसाराचा गाढा ऊस ठेकेदार मुकादम, वाहनमालक यांच्याकडून उचलीवर व जनावरांच्या दुभत्यावर चालतो़ उसाचा गळीत हंगाम संपत आला की या मजुरांना गड्या आपला गाव बरा म्हणून गावाकडे परतण्याची ओढ लागलेली असते़ यंदा बीड, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकातील इंडी, जालना या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़ कुपनलिका, विहिरी आटल्याने माणसांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे़ त्यामुळे जनावरांना चारा तर नाहीच शिवाय त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणेही कठीण बनले आहे़ त्यामुळे ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांनी गावाकडे असलेल्या नातेवाईकांशी संपर्क करुन परिस्थितीची माहिती घेऊन किमान एखादा वळवाचा पाऊस पडून विहीर, कूपनलिकांना पाणी येईपर्यंत ऊसतोडीच्या भागातच राहण्याचा निर्णय घेतला आहे़ ऊसतोड करणाऱ्या मजुरांना शेतातील मजुरीची कामे फारसे जमत नाही़ मात्र परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी व रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत़ दुष्काळाची छाया कोल्हापूर जिल्ह्यातही जाणवत असून, नदीतील पाणी आटल्याने पाण्याअभावी या भागातील उभे पिकही करपू लागले आहेत़ त्यामुळे शेतीची कामेही ठप्प असल्याने या ऊसतोड मजुरांना मजुरीअभावीही हाल सोसावे लागत आहे़
ऊसतोड मजूर बनले शेतमजूर
By admin | Published: May 04, 2016 12:06 AM