कोल्हापूर : पतीच्या वीरमरणानंतर शासनाने देऊ केलेली हक्काची जागा गेल्या १४ वर्षांपासून नावावर होत नसल्याच्या कारणास्तव प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिलेल्या वीरपत्नी वृषाली तोरसकर यांनी आपला निर्णय स्थगित केला. जिल्हा प्रशासनासोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी आपण आत्मदहन करणार नसल्याचे पत्र सोमवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.
गडहिंग्लज येथील वृषाली तोरसकर यांचे पती महादेव तोरसकर यांना २००१ मध्ये वीरमरण आल्यानंतर वृषाली यांना शासनाकडून घरकुलासाठी जमीन मिळाली होती. बांधकाम सुरू असताना ही जागा ओपन स्पेसमध्ये असल्याने हा वाद न्यायालयात गेला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही प्रतिसाद मिळत नाही. या कारणास्तव त्यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र गेल्या चार दिवसांत जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर व न्यायालयीन प्रक्रिया लवकर घेण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर तोरस्कर यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला आहे. सोमवारी सायंकाळी आजी माजी सैनिक वेल्फेअर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन याबाबतचे लेखी पत्र दिले. यामुळे जिल्हा प्रशासनासह स्थानिक तलाठी, तहसीलदार यांचाही जीव भांड्यात पडला.
--