कसबा बावडा :
येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३६ वी वार्षिक सर्वसाधारण ऑनलाइन सभा विषयपत्रिकेवरील विषयावरच्या वाचनानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत मंजूरच्या आवाजात संपली. या सभेत विरोधकांचा आवाज सत्तारूढ गटाने ‘म्यूट’ करून दाबला व सभेत प्रश्न विचारण्यापासून रोखले, असा आरोप राजश्री छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने करण्यात आला. विरोधकांनी श्रीराम सोसायटीच्या सभागृहात समांतर सभा घेतली.
‘राजाराम’ची वार्षिक सभा कोरोनामुळे ऑनलाइन झाली. अकरा वाजता सुरू झालेली सभा सव्वा अकरा वाजता संपली. यावेळी तज्ज्ञ संचालक व माजी आ. महादेवराव महाडिक, माजी आ. अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने यांनी राजाराम कारखान्याचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. ऊस तोडणीसाठी ऊस टोळ्या अपुऱ्या आल्या होत्या; पण त्यातून मार्ग काढून कारखाना यशस्वीरीत्या चालविला असल्याचे सांगितले.
प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. एक-एक विषय त्यांनी मंजुरीसाठी विषय पटलावर ठेवला. मंजूरच्या घोषणेत हे विषय मंजूर झाले आणि अवघ्या पंधरा मिनिटांत ही सभा संपली. यावेळी व्हाइस चेअरमन वसंत बेनाडे, संचालक दिलीप पाटील, संचालक दिलीप उलपे, हरीश चौगुले, तज्ज्ञ सल्लागार पी.जी. मेढे, सेक्रेटरी यू. एम. मोरे उपस्थित होते.
चौकट : राजारामच्या सभेत अप्पा बोललेच नाहीत...
राजाराम साखर कारखाना व गोकूळची निवडणूक तोंडावर आल्याने माजी आ. महादेवराव महाडिक राजारामच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेमके काय बोलणार, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागून राहिली होती; पण या सभेत महाडिक यांनी भाषणच केले नाही. त्यामुळे ते काहीच कसे बोलले नाहीत, याचीच चर्चा सुरू होती.
फोटो:२२ राजाराम कारखाना सभा
कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाइन सभेत मार्गदर्शन करताना चेअरमन सर्जेराव माने. यावेळी माजी आ. महादेवराव महाडिक, माजी आ. अमल महाडिक, व्हा. चेअरमन वसंत बेनाडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.