कोल्हापूर : साडेचार महिन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूमध्ये बुधवारी खंड पडला आहे. जिल्ह्यात नव्याने १०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोना चाचण्यांचीही संख्या कमी करण्यात आली आहे. सध्या १४२८ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान १० जानेवारी २०२१ रोजी आजरा तालुक्यातील महिलेचा पहिला मृत्यू नोंदवण्यात आला होता. यानंतर अनेक दिवसांनी पुन्हा मार्चमध्ये मृतांची संख्या हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. १४ मार्च २०२१ रोजी मृतांची संख्या ० होती. तर २ एप्रिल रोजी हीच संख्या पाचवर गेली होती. नंतरच्या काळात मृतांचे आकडे मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. जून आणि जुलैमध्ये तर सरासरी रोज ३० जणांचा मृत्यू झाला. एका दिवशी तर सर्वाधिक ६३ मृतांचा आकडा नोंदवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत मृतांचा आकडा कमी येत येत बुधवारी तो ० वर आला आहे. कोल्हापूर शहरात सर्वाधिक ४१ नवे रुग्ण नोंदवण्यात आले असून हातकणंगले तालुक्यात १० तर करवीर तालुक्यात १४ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला १२ ते १३ हजार कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. त्या आता पाच हजारांवर आल्या आहेत.
चौकट
चार तालुक्यात रुग्णसंख्या ०
भुदरगड, चंदगड, राधानगरी आणि गगनबावडा या चार तालुक्यांमध्ये कोरोना नवीन रुग्णसंख्या ० नोंदवण्यात आली आहे. तर कुरूंदवाड, गडहिंग्लज, कागल, मलकापूर, मुरगूड या चार नगरपालिका कार्यक्षेत्रातही नवी रुग्णसंख्या ० आहे.