: इचलकरंजीत कट्टीमोळा वाढीव पाणी योजनेचा प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कृष्णा योजनेची वारंवारची गळती आणि पंचगंगा नदीतील अपुरा पाणीपुरवठा यामुळे शहराला पाण्याची कमतरता भासत आहे. ती दूर करण्यासाठी कट्टीमोळा डोहातील पाणी योजना सध्या उत्तम पर्याय ठरणार आहे. भविष्यात कृष्णा, पंचगंगा, कट्टीमोळा आणि दूधगंगा योजना यामुळे शहराची पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. येथील नगरपालिकेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचगंगा नदीतील कट्टीमोळा डोह येथून पाणी उपसा करण्यासाठी वाढीव नळपाणी पुरवठा योजनेचा गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आवाडे म्हणाले, शहराला ५४ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. तरीही आपल्याकडे १०८ दशलक्ष लिटरचे जलशुद्धिकरण केंद्र तयार आहे. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पिण्याचे पाणी देण्यासाठी या योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर सांगली नाका, जवाहरनगर व गावभाग या तीन ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहे.
माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी योजनेची विस्तृत माहिती दिली. तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून, त्यामध्ये काटकसर करीत १.२१ कोटीवर ही योजना आणली आहे. १३०० मीटर पाईपलाईन २०० अश्वशक्तीचा पंप याचा वापर करून चौदा दशलक्ष लिटर पाणी उपसा करण्यात येणार आहे. दोन महिन्यांत ही योजना पूर्ण होणार आहे.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, नगरसेवक सुनील पाटील, मदन कारंडे, राजू बोंद्रे, अजित जाधव, ‘ताराराणी’चे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जलअभियंता सुभाष देशपांडे, बाजी कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
११०३२०२१-आयसीएच-०९
पंचगंगा नदीतील कट्टीमोळा डोह येथून पाणी उपसा करण्यासाठी वाढीव नळपाणी पुरवठा योजनेचा गुरुवारी प्रारंभ आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. यावेळी राजू शेट्टी, सुरेश हाळवणकर, अलका स्वामी, दीपक सुर्वे, राहुल आवाडे, सुनील पाटील, मदन कारंडे, राजू बोंद्रे, अजित जाधव, प्रकाश दत्तवाडे, सुभाष देशपांडे, बाजी कांबळे, आदी उपस्थित होते.