इचलकरंजी : राज्य सरकारने कृषी पंप वीजबिल सवलत योजना २०२० जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकीत वीजबिले तपासली जातील व चुकीची सर्व वीजबिले दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई येथील बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या संयुक्त शिष्टमंडळास दिले आहे. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, रावसाहेब तांबे, अन्य संघटना प्रतिनिधी तसेच महावितरणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (देयके) गडकरी, संचालक (प्रकल्प) खंडाईत व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने नवीन वीज जोडणी धोरणांतर्गत वीजबिल सवलत योजना जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या योजनेनुसार सप्टेंबर २०२० अखेर पर्यंतची थकबाकी महावितरण कंपनीच्यावतीने निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार सप्टेंबर २०१५ अखेरच्या थकबाकीवरील सर्व विलंब आकार व सर्व व्याज रद्द करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०२० या ५ वर्षांच्या कालावधीतील थकबाकीवर कंपनीने कर्ज घेतले, त्या दराने व्याज आकारणी होणार आहे. त्यानुसार निश्चित होणारी थकबाकी पहिल्या एका वर्षात भरल्यास ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरुकपणे तक्रार नोंद करावी व स्थळ तपासणीवेळी समक्ष हजर राहून व संपूर्ण माहिती देऊन आपले बिल पूर्णपणे दुरुस्त करुन घ्यावे व मगच योजनेत सहभागी होण्यास मान्यता द्यावी, असे जाहीर आवाहन सर्व संघटनांच्यावतीने सर्व शेती पंप वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.
शेतीपंप वीज ग्राहकांची थकीत, चुकीची वीज बिले दुरुस्त करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:23 AM