कोल्हापूर : तळागाळातील विद्यार्थिनींना उच्चशिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र, सरकारकडूनमहाविद्यालयांना दिली जाणारी प्रतिपूर्ती रक्कमच मिळाली नसल्याने सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयांनी मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे. सरकारच आम्हाला पैसे देत नाही तर आम्ही तुम्हाला कसे मोफत शिक्षण द्यायचे, असा सवाल या महाविद्यालयांकडून केला जात आहे.मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार उच्चशिक्षणमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जाते. त्याची प्रतिपूर्ती रक्कम सरकारकडून महाविद्यालयाला दिली जात आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे.
विशेष म्हणजे, ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी या महाविद्यालयांनी पात्रताधारक मुलींना एकही रुपया शुल्क घेतले नाही. मात्र, दुसऱ्या वर्षी सरकारकडून पैसेच मिळाले नसल्याचे सांगत पैसे भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींसह पालकही हतबल झाले आहेत.
कारवाईचा उरला नाही धाकराज्य सरकारने मोफत शिक्षण योजना सुरू केल्यानंतर काही महाविद्यालयांनी मुलींकडून शैक्षणिक शुल्क मागण्याचा प्रयत्न केला असता अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या. असे शैक्षणिक शुल्क कोण मागणी करीत असेल तर थेट उच्च व तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालकांकडे तक्रार करण्याचे आवाहनही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले होते. कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देऊनही काही महाविद्यालये खुलेआम शुल्क मागत असल्याने शिक्षण विभागाच्या कारवाईचा धाक उरला नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
त्या महाविद्यालयाकडून खुलेआम शुल्काची मागणीकोल्हापूर शहरातील एका विधि महाविद्यालयाने तृतीय वर्षातील मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे. सरकारकडून पैसे आले नाहीत, शुल्क भरा अशी मागणी होऊ लागल्याने विद्यार्थिनींसह पालकांना काही सुचेनासे झाले आहे.