पोर्ले तर्फ ठाणे : कोतोली- नांदगाव रोडवरील वाघवे- उदाळवाडीदरम्यानच्या ओढ्याजवळ लावलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकी धडकून वायरमनाचा मृत्यू झाला. दिनकर विष्णू पाटील (वय ५५, रा. उत्रे, ता. पन्हाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डोक्याला हेल्मेट असते तर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला नसता, अशी घटनास्थळी चर्चा होती. अपघाताची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी दिनकर पाटील कामानिमित्त वाघवे येथे गेले होते. दुचाकीवरून रात्री ८.३० वाजता उत्रे गावी येत असताना वाघवे-उदाळवाडीदरम्यान असणाऱ्या ओढ्याजवळील रस्त्या कडेला उसाने भरलेला ट्रॅक्टर-ट्राॅली लावला होता. समोर येणारा वाहनाच्या लाइटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने त्यांना पुढचे काहीच दिसले नाही. त्यामुळे रस्त्याकडेला उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेत ऊस घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ते पोर्ले तर्फ ठाणे येथील महावितरणच्या कार्यालयात वायरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
०४दिनकर विष्णू पाटील